विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच – बॅड टच’ या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला.

यंग नेटवर्क फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावल तालुकामधील गैरसरकारी संस्था यंग नेटवर्क फाउंडेशन यांच्या जनजागृती उपक्रमांतर्गत नायगाव येथील जिल्हा परिषद शाळा, नायगावमध्ये 28 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘गुड टच – बॅड टच’ या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी,
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला आदरांजली अर्पण करण्यात आली.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट मालेगाव येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील क्रूर अत्याचारासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा कुठेही घडू नयेत यासाठी शालेय वयातच जनजागृती घडवणे हे आहे. याच पार्श्वभूमीवर यंग नेटवर्क फाउंडेशनने तालुक्यात ‘गुड टच – बॅड टच’ जागृती श्रृंखला सुरू केली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. शशिकांत वारूळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमिषांपासून सावध राहण्याचे महत्त्व पटवून दिले. “चॉकलेट, आईस्क्रीम, गिफ्ट, मोबाईल अशा प्रलोभनांमधून मुलांशी जवळीक साधली जाते. दुर्दैवी घटनांमध्ये 90% आरोपी हा ओळखीतील किंवा जवळचा असतो. त्यामुळे कोणत्याही आमिषाला ‘नकार’ देता आला पाहिजे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
हा कार्यक्रम स्वयंसेवक मनोज पवार, अशोक धनगर आणि राजेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र पारधी सर होते. सूत्रसंचालन भरत शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश खुणेपिंप्रे यांनी मानले.
यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळा, नायगावमधील मानसिंग भुगावडे सर, भारती पाटील, ललिता माळी, नजमा तडवी, किशोर पाटील आणि यंग नेटवर्क फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
